उरुळी कांचनमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; वरिष्ट पोलीस निरक्षक यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
उरुळी कांचन (प्रतिनिधी):
उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, संपूर्ण परिसरात या गैरप्रकारांची उघड चर्चा सुरू आहे. दारू विक्री, जुगार, मटका, हातभट्टी, गांजा विक्री यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय कोणतीही भीती न बाळगता खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बाजारतळ येथील मटका जुगार चालू असल्याचा व्हिडिओ
नागरिकांच्या माहितीनुसार, उरुळी कांचन गावात तब्बल चार मटक्याचे अड्डे, चिमणी पाटाच्या परिसरात सोरट्याचे तीन अवैध धंदे, तर सहा मोठ्या ठिकाणी हातभट्टीची खुलेआम विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. याशिवाय आठ ठिकाणी टपरी व दुकानांमधून पेट्रोलची बेकायदेशीर विक्री, दोन ठिकाणी गांजा विक्री, दोन जुगार क्लब, तसेच पांढरवळ परिसरात तीन हातभट्टीचे अड्डे सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत.
शिवाय, शिवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात ८ ते १० ठिकाणी हातभट्टी तयार केली जात असल्याचा आरोप, तर नायगाव येथे मटका जुगाराचा अड्डा असल्याचीही चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे, या सर्व प्रकारांविरोधात नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे “हे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या माहितीशिवाय किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्षाशिवाय शक्यच नाही” अशी दबक्या आवाजात पण ठाम चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.
अशाप्रकारे अनेक विविध ठिकाणी अवैद्य धंद्याचा काळाबाजार चालू आहे
पोलीस स्टेशनच्या हद्दीतच इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे निर्धास्तपणे सुरू असतील, तर कायद्याचा धाक नेमका कुणाला आहे? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणांसाठी तत्काळ कारवाई केली जाते; मात्र अवैध धंद्यांच्या बाबतीत पोलीस प्रशासनाची भूमिका कायमच संशयास्पद राहिली आहे, असा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भूमिका नेमकी काय आहे, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित अधिकारी यावर मौन बाळगणार की नागरिकांच्या आरोपांवर खुलासा करून ठोस कारवाई करणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्यासह आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा नागरिक व सामाजिक संघटनांनी दिला आहे.




